येस न्युज नेटवर्क : गुजरातच्या मोर्बी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोर्बी जिल्ह्यात एका मिठाच्या कारखान्यातील भिंत कोसळल्याने 12 जाणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. तसंच, आणखी काहीजण अडकल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोरबी येथील हलवड जीआयडीसी येथे मिठाच्या कारखान्यामध्ये कामगार काम करत होते. त्याचवेळी या कारखान्यातील भिंत कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून 12 कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच, प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०-५० हजार रुपये दिले जाणार आहेत.