नाशिक : लातूर, नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती चांगली आहे. नाशिकमध्येवंचित बहुजन आघाडीला संधी आहे. सरकारने बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू, असा दावा त्यांनी केला. नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्ष बाजूला ठेवून व्यक्तिगत पातळीवर निवडणूक आणली जात असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
यावेळी अॅड आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी महापालिका निवडणुकीचे निमित्त साधून मुंबईत येऊन मेट्रोचे एकदा नव्हे दोनदा उद्घाटन केल्याने पंतप्रधानपदाची पातळी ग्रामपंचायतीच्या स्तरापर्यंत घसरली आहे. पंतप्रधानपदाच्या व्यक्तीने लोकसभा, विधानसभा प्रचारासाठी मैदानात उतरण्यास हरकत नाही. व्यक्ती स्वातंत्र्य असले तरी पंतप्रधानांनी कोणत्या निवडणूक प्रचाराला जायचे हे ठरवले पाहिजे, असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रतन बनसोड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत. ते म्हणाले, पदवीधर मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसल्याने शुभांगी पाटील यांनी शिवसेनेशी संपर्क साधून मिळविलेला पाठिंबा यात त्यांची हुशारी आहे. शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा देण्यास आमचा आक्षेप नाही. अद्याप शिवसेना व वंचित बहुजन आघाडी चर्चेच्या पातळीवर मर्यादित आहे. चर्चेअंती एकमेकांना शब्द दिल्यानंतरच शिवसेनेने दिलेल्या उमेदवारावर बोलता येईल. राज्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास हरकत नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी किती दिवस यासाठी प्रयत्न करावे यालादेखील मर्यादा आहे, हे समजून घेतले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी का चालत नाही हे काँग्रेसला विचारावे, असा सल्ला देताना मी पुष्पहार घालण्यास तयार आहे. काँग्रेसने मान पुढे केली पाहिजे. गरीब मराठे व इतर मागासवर्गीयांची सत्ता काँग्रेसला नको आहे. यातून श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला हात लागण्याची भीती असल्याने वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले जात नसल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.
नाशिकमध्ये आम्हाला संधी
लातूर, नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती चांगली आहे. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला संधी आहे. सरकारने बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू, असा दावा त्यांनी केला. नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्ष बाजूला ठेवून व्यक्तिगत पातळीवर निवडणूक आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष पवन पवार व शहराध्यक्ष अविनाश शिंदे उपस्थित होते.