येस न्युज मराठी नेटवर्क : देशभरात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून भारतात दिवसाला ३ लाखांच्या वर नवे करोनाबाधित सापडत आहेत. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील सातत्याने ३५०० च्या वर राहिला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ लागला असून अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांचे प्राण गेल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं आहे. “भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं”, असं ते म्हणाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ३ लाख ८२ हजार ३१५ नवे करोनाबाधित सापडले असून ३ हजार ७८० करोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.