महाड: पाच दिवसानंतर अखेर महाडच्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेत जेवढे लोक बेपत्ता झालेत त्या सर्वांना मृत घोषित करा, अशी मागणी तळीयेच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले . या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. तसेच आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, त्याशिवया आम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले होते . मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत.