सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाची सेवा केवळ शहरापुरतीच मर्यादित नसून प्रसंगी मागणीनुसार राज्यभरातील विविध जिल्ह्यांत आतापर्यंत सेवा देण्यात आली आहे. किल्लारी भूकंप, नांदेडमधील गुरुदागद्दी, नाशिकमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यातही या दलाने आपली सेवा बजावली आहे. अतिवृष्टीमुळे सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यात सध्या नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला शासन, प्रशासन तर धावून जात आहेच, शिवाय सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून देखील अनेक संघटना आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत आहेत. मंगळवारी सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर महापालिकेच्या वतीने सफाई – अग्निशमन कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले.
सोलापूरच्या अग्निशामक दलाची सेवा तत्पर आहे. केवळ आग विझविण्यासाठीच नव्हे अन्य आपत्तीप्रसंगी देखील हे दल आपली सेवा देते. किल्लारीच्या भूकंपावेळी या दलाच्या तीन गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. उस्मानाबाद- लातूर येथे लागलेली मोठी आग विझविण्यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या दलाने गाड्या पाठविल्या होत्या. राज्यात एखादा मोठा कार्यक्रम, मेळावा, संमेलन आदी ठिकाणी संभाव्य आपत्तीची शक्यता गृहीत धरून पूर्वखबरदारीची यंत्रणा प्रशासनाकडून ठेवण्यात येते. यासंदर्भात शासनाकडून अग्निशामक सेवा देण्यासाठी मागणी करण्यात होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यासंदर्भातील पत्र आल्यावर महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून सेवा दिली जाते.2007 मध्ये नांदेडमध्ये शीख बांधवांच्या गुरुदागद्दीचा कार्यक्रम तर 2012 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा झाला. या दोन्ही ठिकाणी सोलापूरच्या अग्निशमन दलाने आगीचे बंब पाठविले होते. केवळ राज्यातच नव्हे परराज्यात देखील या दलाने सेवा दिली आहे. विजयपूर येथे आगीची मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हाही सोलापूरहून अग्निशामक दलाची गाडी पाठविण्यात आली होती.
सोलापूर शहरासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाची सेवा सुसज्ज आहे. आग विझविण्याबरोबरच अन्य आपत्ती संदर्भातही या दलाकडून केवळ शहरच नव्हे तर परजिल्ह्यातही मागणीनुसार सेवा दिली जाते.
- केदार आवटे, अधीक्षक, महापालिका अग्निशामक दल, सोलापूर