नाशिक : जिल्ह्यातील वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या सहा तरुण आणि तरुणींचा बुडून मृत्यू झाला. धरणावर उत्साहाच्या भरात फोटो काढत असताना काहींचा तोल गेला आणि वालदेवी धरणात पडले. त्यानंतर अन्य बाकीच्यांनी धरणात उडी घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तेही बुडाले. सिडको परिसरात हे सहा जण राहत होते. विल्होळी येथील वालदेवी धरणात या सर्व सहा जण बुडाले तर एकाचा मृतदेह रात्री उशिरा हाती लागला. या घटनेमुळे शहर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विल्लोळी गावाजवळील वालदेवी धरणावर पाच तरुणी आणि एक युवक फिरण्यासाठी गेले होते. धरणाच्या कडेला उभे राहून या तरुणी आणि युवक फोटो काढत असताना त्यातील काही जणांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले आणि ते बुडू लागले. हे लक्षात येतात यातील उर्वरित बाकीच्यांनी देखील पाण्यात उड्या घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने आणि काहींना पोहोता येत नसल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. सहा जणांचा धरणाच्या पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.