नवी दिल्ली: अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा यांचं गुरुवारी निधन झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार विकास शर्मांना ताप आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यातून बरे झाले होते.
विकास शर्मा रिपब्लिक भारत टीव्हीवर रात्री 9 वाजताचा ‘ये भारत की बात है’ हा कार्यक्रम घ्यायचे. विकास शर्मा यांच्या निधनावर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. विकास शर्मा यांच्या निधनानं रिपब्लिक नेटवर्कचं मोठं नुकसान झाल्याची भावना अर्णव गोस्वामी यांनी व्यक्त केलीय. विकास शर्मा यांची अँकरिंग करण्याची एक वेगळी शैली होती मात्र ते या जगात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचं अर्णव गोस्वामी म्हणाले.