येस न्युज मराठी नेटवर्क : “सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा कोजनरेशन चिमणी मुळे धर्मराज काडादी , कारखाना प्रशासन , सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावर कोणत्याही क्षणी होऊ शकते शिक्षेची कारवाई -उच्च न्यायालयातील अवमान याचिका व प्रदूषण नियंत्रण मंडळा कडील तक्रारीचा परिणाम.”
सोलापूर: २६/०७/२०२१: २०१४ साला पासून होटगी रोड वरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने संपूर्णपणे बेकायदेशीररीत्या को-जनरेशन प्लांट व ९० मीटर उंचीची चिमणी उभा केली.गेल्या अनेक वर्षापासून ही चिमणी पाडून सुसज्ज होटगी रोड विमानतळाचा मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी सुकर करावा अशी सोलापूरच्या नागरिकांची तक्रार होती परंतु त्यास यश येताना दिसत नव्हते. गेल्या वर्षभरात बऱ्याचदा सोलापूरचे आयुक्त श्री. पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर व महापौर सौ.महाकांचन यन्न्नम यांना अनेकदा निवेदने देण्यात आली परंतु त्याचा त्यांनी कधीही गांभीर्याने विचार केला नाही. खरेतर २१ डिसेंबर २०२० च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ जानेवारी २०२१ नंतर आयुक्त श्री. पी शिवशंकर यांनी तात्काळ ही चिमणी पाडून टाकून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान वाहतूक व मोठे विमान उतरण्यासाठी विमानाची धावपट्टी मोकळी करून देणे अत्यंत गरजेचे होते तसे केले असते तर करोनाच्या रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन, महत्वाचीऔषधे, मेडिकल उपकरणे वेळीच सोलापूरच्या व आजूबाजूच्या रुग्णांना मिळाली असती व येथील अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला करोनाचा प्रादुर्भाव व मृतांचा आकडा कमी झाला असता . सोलापूर आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. यावर सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी नुसतीच खोटी आश्वासन दिल्याशिवाय कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नसल्याने, दि.२० एप्रिल २०२१ रोजी डॉ. संदीप आडके, अस्थिरोग तज्ञ ,सोलापूर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे चिमणी पाडकाम करण्याबाबत कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी , सोलापूरचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासन त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली . तसेच कारखान्याचे माजी तज्ञ संचालक श्री.संजय थोबडे यांच्या तक्रारीनुसार ८ जून २०२१ रोजी राष्ट्रीय हरित लवादाने एक ऑर्डर देऊन दोन महिन्याच्या आत सिद्धेश्वर कारखान्याच्या मुळे झालेले वायू ,जमीन आणि पाण्याच्या प्रदूषण आणि त्यावर करण्यात आलेली कारवाईचा अहवाल ८ऑगस्ट २१ पर्यंत पाठवण्यास सांगितले आहे.एका बाजूला कोर्टाच्या २ अवमान याचिकेंची टांगती तलवार आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय हरित लवादाचा बडगा या दोन्ही मध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा चिमणीच नव्हे तर आता संपूर्ण कारखानाच अडकला आहे. ०४/०७/२०२१ रोजी
डॉ. संदीप आडके यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे साखर कारखाना करत असलेल्या वायु, पाणी व जमीन त्याच्या प्रदूषणाबद्दल तक्रार केली आहे.
याबाबतीत दि.०५ जुलै २१ रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या बरोबर याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके, संजय थोबडे,सोलापूर महानगरपालिका ,एअरपोर्ट ऑथोरिटी सोलापूर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक झाली होती.
त्यानुसार दि.०७ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, संतोष कुंभार ,समीर सरगर यांच्यावर फौजदारी केस सोलापूर जिल्हा न्यायालयात (८२२/२०२१) पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५व १६ अंतर्गत दाखल केली आहे यामुळे संपूर्ण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यंत केलेले वायू, जमीन आणि पाण्याचे प्रदूषणा मुळे ५ ते ७ वर्षापर्यंत कारावास व दररोज पाच हजारापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच माननीय उच्च न्यायालयाचे चिमणी पाडून टाकण्याचे आदेश न मानल्यामुळे सोलापूरचे आयुक्त, जिल्हाधिकारी , कारखाना अध्यक्ष धर्मराज काडादी, महाराष्ट्र शासन यांच्यावर अटकेची व दंडाची कारवाई डॉ. संदीप आडके आणि श्री.संजय थोबडे यांच्या अवमान याचिकेमुळे केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आतातरी खडबडून जागे होऊन चिमणी पाडकामाची कारवाई त्वरित करते का शिक्षा भोगते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.