सोलापूर : महाराष्ट्र पुढील वर्षीच्या गाळप हंगामात विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात राज्यात 112 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयास याबाबत एक पत्र लिहिले आहे. 2021-22 च्या गाळप हंगामात राज्यात 12.32 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल, असा अंदाज त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे. येत्या हंगामात एक हजार 96 लाख टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा एक हजार 12 लाख टन उसाचे गाळप होऊन झालेल्या 106.3 लाख साखर उत्पादनापेक्षा पुढील हंगामातील साखर उत्पादन अधिक राहील.
येत्या हंगामात साधारण 192 कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात 190 कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या मते, निधीची तरलता राखून ठेवण्यासाठी कारखान्यांना आर्थिक दबावाखाली कमी किमतीत सध्या साखर विकावी लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने निश्चित केलेली एफआरपी देऊ शकत नाहीत.