पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आजपासून पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
अरबी समुद्रातील वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र अद्याप अपेक्षित पाऊस पडला नाही.अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान किनारपट्टीच्या भागात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.