मुंबई : जुलै महिना उजाडला तरी हवा तसा पाऊस राज्यात झाला नाही. त्यामुळे राज्यावर लवकरच पाणीसंकट येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मराठवाडा, विदर्भ, कोकण भागात जोरदार पाऊस झाला असला तरी धरणांमध्ये हवा तसा पाठीसाठा झालेला नाही.राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 27.29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा साडे चार टक्क्यांनी कमी आहे.राज्यातील एकूण तीन हजार 267 लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये 11 जुलैपर्यंत 17 हजार 846 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हा पाणीसाठा 31.88 टक्के होता. कोकणात काहीशी वेगळी परिस्थिती आहे. कोकणात पावसानं जोर धरल्यानं धरणात नव्या पाण्याची आवक सुरु झाली. त्यामुळे लघू प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाल्याचं चित्र आहे. कोयना धरणात काही प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.धक्कादायक म्हणजेच उजनीत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.जवळपास 141 मोटी धरण राज्यात आहेत. त्यात कोयना, जायकवाडी, उजनी, मुळा, पावना, वारणा या धरणांचा त्याता समावेश आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी मोठ्या धरणांमध्ये 35.84 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.