नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केले जाणार असल्याचंही सांगण्यात आले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. “१५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट गेणार आहेत तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत. तसेच लाल किल्ल्यावरील सत्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या ठिकाणी ते खेळाडूंशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आले आहे.भारताने यंदा आपला ऑलिम्पिकमधील सर्वात मोठा चमू पाठवला असून त्यात १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन पदकं निश्चित झाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने आपलं पदक शुक्रवारी झालेल्या सामन्यामधील विजयासहीत निश्चित केलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवात दमदार झाल्याचं अधोरेखित करणारे दोन ट्विट मोदींनी सोमवारी केले होते. यामध्येही त्यांनी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या यशाचा उल्लेख केला होता. “भारत ऑगस्ट महिन्यात प्रवेश करत असून अमृत मोहोत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक भारतीयाला स्पर्श करणाऱ्या (अभिमान वाटणाऱ्या) घटना घडत आहेत. विक्रमी लसीकरणाबरोबरच सर्वाधिक जीएसटी संकलनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे संकेत दिसत आहेत,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.