सोलापूर – जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त झालेला उत्तर सोलापूर तालुका स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा क्र.२ अंतर्गत गावातील पाणी व स्वच्छतेबाबतच्या घटकांची पडताळणी करुन विशेषतः घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करुन या तालुक्याने राज्यात आदर्श निर्माण करावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा क्र.२ (ओडीएफ प्लस ) अंतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणी व स्वच्छतेबाबत घटकांची पडताळणी करुन घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे.यासाठी पंचायत समिती , उत्तर सोलापूर येथे आज पंचायत समितीचे विभाग प्रमुख, ग्राम विकास अधिकारी , ग्रामसेवक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार हे बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , डॉ.ए.सी.मुजावर , सचिन सोनवणे , शंकर बंडगर , महादेव शिंदे , प्रशांत दबडे , यशवंती धत्तुरे , अर्चना कणकी , दिपाली व्हटे,कनिष्ठ सहाय्यक अधिकारी श्री नागेश धोत्रे, कनिष्ठ अभियंता गाडेकर, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, शंकर पाथरवट सी.आर.सी.अनंत सितापराव , मोनिका दिनकर , राहूल बाबरे आदी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची पडताळणी करून स्वच्छता ही शाश्वत ठेवण्याचे काम हे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळेत पूर्ण करावे असे सांगितले.सदर बैठकीत पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ.ए.सी.मुजावर , स्वच्छता तज्ञ महादेव शिंदे, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी यांनी स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा क्र.२ (ओडीएफ प्लस ) अंतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या गावामध्ये पाणी व स्वच्छतेबाबत घटकांची पडताळणी कशी करावयाची , घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे करावयाचे आहे याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे माहिती सांगितली.