नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं. दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली ही मतं मांडली.
नितीन गडकरी म्हणाले, “पंडीत जवाहरलाल नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते होते. दोघेही आम्ही आमच्या लोकशाही मर्यादांचं पालन करु असे म्हणत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कामाचा वारसा आमच्यासाठी प्रोत्साहनचा स्त्रोत आहे. जवाहरलाल नेहरु यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान आहे.”
संसदेच्या मान्सून अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगसस मालवेअरचा उपयोग करुन पाळत ठेवल्याच्या आरोपावरुन जोरदार गोंधळ घातला. यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं.
लोकशाहीत वागण्याची ही पद्धत नाही, अटलजींनी गडकरींना सुनावलं
नितीन गडकरी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत एक महत्त्वाची आठवण सांगितली. ते म्हणाले, “मी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता होतो. तेव्हा मी सभागृहातील गोंधळाचं नेतृत्व करत होतो. दरम्यान मी अटलबिहारी वाजपेयी यांना भेटलो. तेव्हा वाजपेयी यांनी ही लोकशाहीत वागण्याची पद्धत नाही. लोकांपर्यंत योग्य संदेश देणं महत्त्वाचं आहे.”