महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील नऊ जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे तसेच रणजीतसिंह मोहिते पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली होती. या नऊ जागांवर 13 मे 2020 रोजी निवडणूक होऊन आमदारांद्वारे मतदान करून त्यांची निवड करण्यात आली होती. विधान परिषदेतील त्यांचा सहा वर्षाचा कालावधी 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. एकीकडे मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील शिंदे सेनेमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार की वेगळी भूमिका घेणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. शिवाय ते पुन्हा इच्छुक आहेत. शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली त्यामुळे आता आपणाला महाविकास आघाडीने पुन्हा विधान परिषदेची आमदारकी द्यावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात अनेक राजकीय घडामोडी होणार असे दिसते. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदाररणजितसिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
