अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकासकामांची माहिती घेत समस्यांचे तत्काळ निवारण : कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
सोलापूर – शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी आता थेट बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासकामांबाबत संवाद सुरू केला आहे. या अभियानाचे उद् घाटन मंगळवारी पद्म नगर येथील आरकल गार्डन मध्ये झाले. अभियानाच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधील समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक शेखर इगे, नगरसेविका पूजा वाडेकर, नगरसेवक सतीश सिरसिल्ला,नगरसेविका रंजिता चाकोते, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम,मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने,बजरंग कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, शिवराज गायकवाड,महापालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक दोन चे अधिकारी रऊफ सरकाझी साहेब विभागीय कार्यालय क्रमांक तीन चे हनीफ बक्षी साहेब विभागीय कार्यालय क्रमांक आठ चे गायधनकर साहेब, तसेच झोनचे इंजिनिअर, प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभागाचे नगरसेवक, मंडल पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आजी-माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रभागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तत्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या.यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्ते, शहर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक जनतेपर्यंत जाऊन पक्षाचे काम करत असतात त्यामुळे त्यांना विकासकामांबाबत काय अडचणी आहेत याची सखोल माहिती असते तसेच कोणती विकासकामे प्राधान्याने करावीत याचीही जाण या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे त्यांनी सुचवलेली विकासकामे प्राधान्याने करण्यासाठी,नगरसेवकांप्रमाणेच अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सन्मान प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुचवलेली विकासकामे करावीत आणि कार्यकर्त्यांनीही महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान ठेवून काम करून घ्यावे. शहर विकासासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नका. शहराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तितका निधी पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र शासनाकडून आपण आणू, असा विश्वास यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, जनतेचे तळागाळातील प्रश्न या अभियानामुळे कळाले. शहराच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांची तळमळ यातून दिसून येते. आगामी काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी, वीज पुरवठा, उद्यान, स्वच्छता याबाबतच्या समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूक नसतानाही घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक
आगामी चार वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका आल्यानंतर जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद होण्याच्या काळात आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र पुढील चार वर्षे कोणत्याही निवडणुका नसतानाही प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाचे नागरिकांनी कौतुक केले. अनेक समस्यांबाबत जागेवरच महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देत संबंधित समस्या सोडविल्यामुळे नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.
मतदान न झालेल्या भागातही विकास करू
प्रभाग चलो अभियानातील चर्चेप्रसंगी एका कार्यकर्त्याने मतदारसंघातील एका परिसरात ४०० मतदान आहे त्यामुळे येथे विकासकामे व्हावीत अशी सूचना मांडली. त्यावर आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मतदानाचा विचार करू नका. ज्या परिसरातून मतदान झाले आहे त्या ठिकाणी विकास होणारच आहे. परंतु एक मतदान झाले असेल तरी तिथे विकासकामे करू. इतकेच नव्हे तर ज्या परिसरातून विरोधात मतदान झाले आहे तेथे देखील विकासकामे थांबणार नाहीत.

