मुंबई : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.
आरोग्य भरतीचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत
गट क साठी 15 लाख रुपये आणि गट क साठी 8 लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.