नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर पथसंचलन झालं. यावेळी देशभरातील चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रानेही आपला चित्ररथ सादर केला. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या चित्ररथाने अनेकांची मने जिंकून घेतली. या चित्ररथांना पुरस्कार देण्यासाठी ऑनलाईन मतदानही मागवण्यात आलं. देशभरातील नागरिकांनी या ऑनलाईन मतदानास मोठा प्रतिसादही दिला. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक मतदान झालं.
मात्र, प्रजासत्ताक दिन होऊन आठ दिवस उलटले तरी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक मतदान झालं म्हणून तर केंद्र सरकार चित्ररथांच्या पुरस्काराची घोषणा करत नाही ना? असा सवाल केला जात आहे. केंद्राकडूनही पुरस्काराची घोषणा का केली नाही याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.