हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थिएटरचा “लोकमान्य टिळक सभागृह” नामकरण समारंभ मोठ्या थाटात
सोलापूर – लोकमान्य टिळकांचे भारतव्यापी एकमेव नेतृत्व होते. टिळक हे आधुनिक भारताचे पहिले लोकनेते होते. त्यामुळे त्यांचं लोकमान्य हे नाव अत्यंत सार्थक ठरतं. नेतृत्वासाठी जी हत्यार आणि जी माध्यम वापरली पाहिजे,ती सगळी ती टिळकांनी अत्यंत कौशल्याने हाताळली.लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्तेसाठी लढा दिला. टिळकांनी देशासाठी दिलेला त्याग आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या स्थापनेस १७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने वाचनालयाच्या अँफी थिएटरचे ” लोकमान्य टिळक सभागृह ” असे नामकरण करण्याचा समारंभ ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पार पडला.यावेळी “लोकमान्य टिळकांचे नेतृत्व ” या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. मोरे बोलत होते.वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉक्टर श्रीकांत येळेगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ. सदानंद मोरे यांनी लोकमान्य टिळकांच्या विविध पैलूंवर आपल्या व्यख्यानातून यावेळी प्रकाश टाकला.
लोकशाहीमध्ये नेतृत्वाची लोकांना गरज असते.प्रत्येक पावलावर लोक आपले नेतृत्व तावून-सुलाखून घेत असतात. आपला नेता निर्दोष आणि चारित्र्यसंपन्न असला पाहिजे.आपल्या भारत वर्षामध्ये लोकांची ती एक महत्त्वपूर्ण अपेक्षा असते. आणि त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांनी कोणालाही नाही म्हणता कामा नये, असे मोठे ओझं लोक त्या नेत्यांवर ठेवतात.आणि म्हणून लोकशाहीमध्ये नेतृत्व महत्त्वाचे मानले जाते. लोकमान्य टिळक लोकशाहीवादी तर होतेच, परंतु भारतामध्ये स्वातंत्र्य नांदावं,स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही यावी, यासाठी टिळकांनी फार मोठे प्रयत्न केले, असेही डॉ. मोरे यावेळी बोलताना म्हणाले.
डॉ. मोरे म्हणाले,लोकमान्य नावामध्ये लोकांनी जोडलेले बिरूद आहे, ते म्हणजे लोकमान्य. टिळकांचे नेतृत्व लोकमान्य होतं, ते राज्य मान्य नव्हतं. लोकमान्य टिळकांना मिळालेली लोकमान्य ही पदवी सहजासहजी मिळालेली नाही, किंबहुना तो अपघातसुद्धा नाही.लोकमान्य टिळकांचे नेतृत्व हे स्वयंनिर्मित होते, स्वयंघोषित नव्हते.
आपल्याला नेतृत्व करायचे असेल आणि ते टिकवायचं असेल तर त्यासाठी अनेक प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करावी लागते.यासाठी लोकमान्य टिळकांना अनेकांशी स्पर्धा करावी लागली, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांचे आयुष्य संघर्षाने भरलेले आहे, त्या अर्थाने नाट्यपूर्णसुद्धा आहे.लोकमान्य टिळक संघर्षातूनच पुढे जात होते.ब्रिटिश सरकारच्या विरोधात लोकमान्य टिळकांनी मोठ्या संघर्ष केला, असेही डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. लोकमाता टिळकांना शिक्षा झाली तेव्हा त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. मात्र तेव्हा ते काँग्रेस पक्षात नव्हते . टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतर सरकारच्या ब्लॅकलिस्टमध्ये होते. तर त्याचवेळी टिळकांना काँग्रेस पक्षात येण्यास पक्षातीलच मवाळ गटाचा विरोध होता. टिळकांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी गांधींजी मध्स्थाची भूमिका बजावत होते. १९१५ साली टिळकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आणि १९१६साली टिळकांनी संपूर्ण काँग्रेस ताब्यात घेतली आणि त्यानंतर टिळक आपल्या हयातीत काँग्रेस पक्षातच होते, डॉ मोरे यांनी सांगितले.
लोकांशिवाय राजकारण होणार नाही म्हणून जिथे लोक तिथे टिळक असे जणू समीकरणच जमले होते. सरकार अर्ज आणि विनंत्यांना नमणार नाही म्हणून त्यांच्या छाताडावर बसण्याशिवाय पर्याय नाही म्हणून टिळकांनी तिसरा पर्याय म्हणून शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर काढले, स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठे योगदान दिले असल्याचे डॉ मोरे यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांचा सोलापूरशी जवळचा संबंध होता आणि त्यासाठी त्यांच्या स्मृती वाचनालयाने नावाच्या स्वरूपात जपल्याबद्धल डॉ. मोरे यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी डॉ. नभा काकडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. वाचनालयाचे कार्यवाह दत्ता गायकवाड यांनी डॉ. मोरे यांचा परिचय करून दिला. कै . बाबा कुसूरकर यांच्या स्मरणार्थ वाचनालयाला २५ हजार रुपयांची देणगी दिल्याबद्धल पुण्याचे संजीव कुसूरकर यांचा डॉ. मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रा. शंकर साळुंखे,डॉ.सुहास पुजारी,प्रा. सुलभा पिशवीकर , पुष्प आगरकर,पद्माकर कुलकर्णी,मोहन सोहनी,गिरीश दुनाखे,जे. जे. कुलकर्णी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले.
लोकजागृतीचे साधन म्हणून दोन वृत्तपत्रे !
राजकारण हा केवळ अभिजनांचा खेळ नाही, तर जोपर्यंत सर्व लोकांचा रेटा येत नाही, तोपर्यंत ब्रिटिश सरकार सभ्य भाषेला दाद देणार नाही, म्हणून लोक जागृतीचं साधन म्हणून लोकमान्य टिळकांनी ” केसरी ” आणि “मराठा” ही दोन वृत्तपत्रे काढली. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी आणि लोकजागृतीसाठी अनेक सभा घेतल्या.लोकमान्य टिळक हे भारतीय पातळीवरील नेतृत्व करणारे पहिले नेते आहेत. लोकमान्य टिळकांच्या अगोदर जे काही नेते झाले, त्यांना भारताचे नेते म्हणणे अवघड आहे. कारण त्यांना तसे अनुयायी नव्हते, मात्र त्यांच्या – त्यांच्या प्रदेशात कदाचित त्यांचे वजन असेल.थेट सिंध,लाहोर, कराचीपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत, तिकडे कलकत्त्यापर्यंत तसेच वरती पंजाबात आणि भारतात असा एकही प्रांत नाही की जिथे टिळक पोहोचले नव्हते आणि जिथे टिळकांना अनुयायी मिळाले नाहीत, असे लोकमान्य हे एकमेव नेते होते, असे डॉ.मोरे म्हणाले.