नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळातील या बदलाला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे. अधिकृत माहितीनुसार, किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
किरेन रिजिजू म्हणाले की, “आगामी निवडणुका लक्षात घेऊन खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात जन्मलेले किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत.” केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रालयाच्या कामांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतरच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर मंत्रालयांबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.