महापालिकेत स्थायी समितीचा पुन्हा खेळखंडोबा…!
सोलापूर : सोलापूर महापालिकेत स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती निवडीचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेल्या सोमवारी ऐन निवडणुकीच्या वेळी शासनाने पत्र पाठवून निवडणूक स्थगित केली होती. भाजपने हे प्रकरण न्यायालयात नेले होते. शासनाने आपले पत्र माघारी घेतले आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी सकाळी ही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. आणि पुन्हा शासनाचे पत्र आल्यामुळे निवडणूक रद्द करावी लागली. यावेळी विशेष म्हणजे स्थायी समितीवर निवडलेले १६ नगरसेवक आणि परिवहन समिती साठी निवडलेले ६ सदस्य यांच्या निवडीचा २० फेब्रुवारी रोजीचा मनपा ठराव क्रमांक १२७ आणि १२८ शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे आता नव्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे सदस्य निवडावे लागतील आणि त्यानंतर सभापती पदाची निवडणूक घ्यावी लागेल. स्थायी समितीवर भाजपकडून अंबिका पाटील,राजश्री कणके, सुरेखा काकडे, वंदना गायकवाड, राधिका पोसा ,राजश्री पुरड, मेनका राठोड, रवी कैयावाले यांची निवड करण्यात आली होती.

शिवसेनेने अमोल शिंदे ,मनोज शेजवाल, उमेश गायकवाड यांना संधी दिली होती. काँग्रेसकडून चेतन नरुटे, परविन इनामदार, वैष्णवी करगुळे स्थायी समितीवर निवडले होते तर एमआयएमकडून रियाज खैरादी, वंचित बहुजन आघाडीकडून आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादीकडून किसन जाधव यांची स्थायी समितीवर ठराव क्रमांक १२७ द्वारे २० फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली होती. तर परिवहन समितीसाठी भाजपकडून सतिश महाले, सिद्धलिंग मसुती, शिवसेनाकडून नितीन गायकवाड, प्रकाश अवस्थी, एमआयएमकडून अरबाज खैरादी तसेच राष्ट्रवादीकडून पिरसाहेब शेख यांची ठराव क्रमांक १२८ द्वारे २० फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली होती. आता हे दोनीही ठराव शासनाने रद्द केलं आहेत. त्यामुळे या दोन्ही समित्यांचा खेळखंडोबा सुरु झाला आहे.