पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुनावणी घेत पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. आता असाच पेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निर्माण झाला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गट पक्षावर आपापला दावा दाखल करत आहेत. दरम्यान, यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजितदादा नेहमीच खरं आणि योग्य बोलतात, असं जयंत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते
पाटील म्हणाले, की पवार साहेबांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं की आमची बाजू ऐकून घ्या. सहा ऑक्टोबरला सुनावणी होत आहे. आमची बाजू योग्य रीतीने मांडू. निवडणूक आयोग आमची बाजू ऐकून घेत नाहीये. भारताच्या इतिहासात जे संस्थापक अध्यक्ष असतात त्यांचाच पक्ष असतो. पण काही लोक पक्ष आमच्या ताब्यात आला असल्याचे अविर्भावात आहेत. राज्यात आणि देशात राजकीय पक्ष पळवण्याची आणि चोरण्याची पद्धत नव्याने सुरू झाली आहे. निवडणूक आयोग सुजाण असून योग्य तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.