येस न्युज मराठी नेटवर्क । दुसऱ्या टी-२० सामन्यातून दमदार पुनरागमन केलेला भारतीय संघ आज इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झाला आहे. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना रंगणार आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडने सहज मात दिली होती. त्यानंतरच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने इंग्लंडवर सात गड्यांनी सरशी साधली. आयपीएल गाजवलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी दुसर्या टी-२० सामन्यात पदार्पण कले. या सामन्यात सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण, ‘छोटा पॉकेट बडा धमाका’ म्हणून ओळख असलेल्या किशनने इंग्लंडच्या स्टार गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे या दोघांनाही तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाय, भारताच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली असल्याने विराट संघात कोणताही बदल करणार नाही असे समजते.
दुसरीकडे, इंग्लंडचा संघ दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. शिवाय, त्यांचे गोलंदाजही दुसऱ्या टी-२० सामन्यात अपयशी ठरले. सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी धावांवर लगाम घातला. मात्र, त्यांना जास्त बळी घेण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या संघातील वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनच्या २.५ षटकात ३८ धावा कुटल्या. त्यामुळे कर्णधार इयान मॉर्गन संघात कोणता बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे पुन्हा दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न पाहुण्या संघाचा असेल. तर विराटसेना मालिका विजय सुखकर करण्याच्या दृष्टीने हा सामना खिशात घालण्याच्या उद्देशानेच मैदानावर उतरेल.