सोलापूर- भागाईवाडी गावचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय हे आपण सांगता हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे मात्र इतर गावातील चांगल्या कामाचे अनुकरण, विचाराची देवाणघेवाण व गावातील नागरीकांचे पाठबळ असेल तर गावाचा विकास होतो व याच पध्दतीने आपण काम करीत असल्याचे भागाईवाडीचे माजी सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी केले.
शासनाच्या स्व.आर.आर.पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत अक्कलकोट तालुक्यातील दहिटणेवाडी,उत्तर सोलापूर तालुक्यातील कांरबा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील निबर्गी गावास तालुका स्तरीय पुरस्कार मिळाला. त्यांचे अभिनंदन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी पृथ्वीराज माने युवा मंचचे तालुका अध्यक्ष सुनील जाधव,समन्वयक उमेश भगत,सचिव तात्या कदम, शहाजी भोसले,भागाईवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य विजय घोडके, भारत बिराजदार, मल्लीनाथ तंबाखे, अभिमान्यू सुतार, आप्पासाहेब गुंड,संजय आदाटे आदि उपस्थित होते.
गावातील नागरीकांनी गावच्या विकासासाठी सरपंच पदाची जबाबदारी विश्वासाने दिलेली असते..त्या विश्वासास पात्र राहून शासनाच्या गावासाठी व गोरगरिबांसाठी असलेल्या विकास योजना राबवून सरपंचपदाचा व गावचा विकासात्मक लौकीक वाढवा. केवळ नावाला पद काय कामाचे असे त्यांनी सांगितले.शासनाने स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना जाहीर केल्यानंतर पहिल्याच वर्षी भागाईवाडी गावास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला तर जिल्हास्तरावर देखील आम्ही पहिल्या पाचमध्ये होतो.. काम केले की कौतुक करणारे हात बळ देण्यास सदैव पाठीशी असतात तर पुरस्कार हे केलेल्या कामाचे मनोबल वाढवणारे व पुढील कामास प्रेरणादायी व इतर गावासाठी आदर्शवत असल्याचे कविता घोडके पाटील यांनी सांगितले.
पुरस्कार प्राप्त तालुकास्तरीय अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे वाडी गावच्या सरपंच राणी माळगे, उत्तर सोलापूर तालुक्यातील कांरब्यांचे सरपंच कौसल्या सुतार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील निबर्गीच्या सरपंच भावना बिराजदार यांना भेटुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पूरस्कार प्राप्त 11 पैकी 7 तालुक्यातील गावचे सरपंच महिला
तालुका व जिल्हास्तरीय स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यातील 11तालुक्यातीलनिवड झालेल्या ग्रामपंचायतमध्ये सात महिला सरपंच कार्यरत असून महिला आम्ही नारी लई भारी असल्याचे महिलांनी कामातून दाखवून दिल्याचे कौतुकही कविता घोडके पाटील यांनी केले.