सोलापूर – देशात दिनांक 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज दिनांक 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरावर त्या काळातील घडामोडी बाबत तसेच सक्षम लोकशाहीच्या अनुषंगाने चित्र प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा मिळणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशात आणीबाणी जाहीर जाहीर केल्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी आणीबाणी विरोधात लढा दिलेल्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी असलेले गुरुराज कुलकर्णी, किशोर देशपांडे, अनंत दाते, शिरीष कुलकर्णी, सुधारकर कुलकर्णी, बाळासाहेब राऊत, संभाजी आदट, विलास पोरे, रामचंद्र तडवळकर, तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रोहिणी तडवळकर, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी निऱ्हाळी पुढे म्हणाले की, देशातील सन 1975 ते 1977 मधील आणी बाणीच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीचा इतिहास चित्रफीत व चित्रप्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मध्यवर्ती इमारतीमध्ये हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदेशाला भेट देऊन आणीबाणीच्या घटनांचे विविध पैलू जाणून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरुराज कुलकर्णी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “भारत माता की जय” व “भारतीय लोकशाही अमर रहे” या घोषणा देऊन केली. देशाची लोकशाही चिरतरुण रहावी यासाठी आणीबाणीच्या कालावधीत त्या विरोधात संघर्ष उभा करण्यात आला. आणीबाणीच्या घटनेने राज्यघटनेची पायमल्ली होऊन लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यात आली. आणीबाणी विरोधात संघर्ष करणाऱ्या लोकांना बंदीवास भोगावा लागला व त्यांच्या कुटुंबीयांचे खूप हाल झाले. त्याकाळी देश सेवेने प्रेरित झालेल्या लोकांनी लोकशाही संरक्षणासाठी जो लढा निर्माण केला आज त्या लोकांचा योग्य सन्मान शासन करत असल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
किशोर देशपांडे म्हणाले, देशात आणीबाणी लागू करण्यात आलेल्या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. देशात आणीबाणी लागू झाली याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील देशसेवेने प्रेरित तरुणांनी भितीपत्रके, पत्रके, समाजजागृतीसाठी वाटली. या लोकांना कारावास भोगावा लागला. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या विरोधात केलेल्या विविध घटनांची माहिती सविस्तरपणे दिली. जिल्ह्यातून लढा उभा करणाऱ्या लोकांचा आज शासनाच्या वतीने सन्मान होत आहे, याविषयी त्यांनी अभिमान व्यक्त केला.
सामाजिक कार्यकत्या श्रीमती रोहिणी पडळकर यांनी लोकशाही वाचविण्यासाठी जिल्ह्यातील ज्या लोकांनी लढा दिला त्यांचा आयोजित चित्रप्रदर्शनातून आणीबाणी काळात झालेल्या घटनांचा ऊहापोह होणार असल्याचे नमूद केले.
प्रारंभी या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, किशोर देशपांडे, गिरीराज कुलकर्णी व अन्य सर्व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित आणीबाणी कालावधीत बंदीवास भोगलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी या कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश सांगितला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी मानले.
या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने देशात व सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते- नागरिकांची नावे छायाचित्रे समाविष्ट आहेत. या प्रदर्शनातून आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष आणि त्याचे विविध पैलू सर्वसामान्य नागरिकासमोर मांडले जात आहेत. हे प्रदर्शन जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीमध्ये दिनांक 25 जून ते 24 जुलै 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.25 वाजता या कालावधीत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


