अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन
पुढील आठवड्यात बैठकीत घेणार आढावा : आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा
सोलापूर – अण्णाभाऊ साठे चौक येथील रेल्वे पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा करत सूचना दिल्या. आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.अण्णाभाऊ साठे चौक ते मरिआई चौक दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाची कालमर्यादा संपल्यामुळे हा पूल पाडून नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे या कामाला उशीर होत आहे. परिणामी, या रस्त्यावरून रोज ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सामोरे जावे लागत आहे. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करत या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केली होती.
यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्वरित थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत विचारणा केली. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पूल बांधणीचे काम लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. हजारो नागरिक दररोज ये – जा असणारा रस्ता बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गांवर मोठी गर्दी होत आहे. तसेच वाहतूक खोळंबत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे. मी पुढील आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याप्रसंगी सांगितले.त्यानुसार पुढील आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार असून यावेळी पुलाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

