मुंबई : राज्यापालांनी घटनेचा खून करु नये अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “विधान परिषदेच्या 12 जागा तुम्ही कशा रिकाम्या ठेवू शकता? आज 10 महिने होत आले, तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का घटनात्मक पदावर बसून. तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो? की, जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारसी ज्या केलेल्या आहेत, त्यावर सही करणार नाही, असा आदेश राज्यपालांना आले आहेत का? हे राज्यपालांनी स्पष्ट केलं पाहिजे. पण 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे. आणि हा महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा अपमान आहे.”