येस न्युज मराठी नेटवर्क : “ग्रामपंचायत निवडणुकीत जसं यश मिळालं आहे, तसंच यश पदवीधर निवडणुकीतील देखील आहे. दोन दिवसांतच मी स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग झाला, हे आपल्या सर्वांसमोर मी मांडणार आहे. पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झालेली आहे.” असं खळबळजनक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत केलं.
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत असून, यामध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल माहिती देण्यासाठी प्रदेश भाजपा तर्फे पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठवाडा पदवीधरमध्ये पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या, पुणे पदवीधरमध्ये अडीच हजार नावं ही पदवीपेक्षाही खालचं शिक्षण असलेल्यांची आली. ज्याच्यामध्ये कॉलमध्येच सातवी, आठवी असं लिहिलेलं आहे. ११ हजार नावं दुबार होती.”