सहा महिन्यात मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया करण्याचा सर्वसाधारण सभेत ठराव
सोलापूर : येथील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या नूतन विश्वस्त व अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वादामुळे होऊ शकली नाही. निवडीची प्रक्रिया पुढील सहा महिन्यात मतदान पद्धतीने करण्याचा ठराव गोंधळातच करीत ही सभा आटोपण्यात आली.
संस्थेची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, रामचंद्र जन्नू, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर अरकाल, जनार्दन कारमपुरी, सचिव संतोष सोमा आदी व्यासपीठावर होते. सभेच्या कामकाजास सकाळी साडेदहा वाजता सुरुवात करण्यात आली मात्र कोरम नसल्याने सभा अर्ध्या तासासाठी करण्यात आली. त्यानंतर अकरा वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.
प्रारंभी वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर उत्पन्न खर्च पत्रक, ताळेबंद पत्रक, सन 2025-26 च्या अंदाजपत्रकाला मंजुरीची प्रक्रिया पार पडली. या विषयांशिवाय सभेच्या अजेंड्यावर नूतन पाच विश्वस्त तसेच अध्यक्ष निवडणे आदी विषयदेखील होते. यापैकी विश्वस्त निवडीचा विषयावर कामकाज सुरू झाल्यावर सभेत एकमत न झाल्याने वाद निर्माण झाला. या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मंडळींकडून करण्यात आला, मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गोंधळ वाढतच गेला. विश्वस्त निवडीचा पेच सुटला नसताना याच गोंधळात सभासदांनी अध्यक्ष निवडीबाबत बोलण्यास सुरुवात केली. अशोक इंदापुरे, दयानंद कोंडाबत्तीनी, व्यंकटेश कोंडी, नागेश सरगम आदी सभासदांनी अध्यक्षपदी पुन्हा सुरेश फलमारी यांना संधी देऊ नये, अशी आग्रही मागणी केली. अध्यक्षपदासाठी अशोक इंदापुरे, संतोष सोमा आदी मंडळी इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अध्यक्ष निवडीबाबत तोडगा करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली यांनी केला.
अध्यक्षपदी पुन्हा फलमारी यांना संधी द्यायचा विचार आहे, फलमारीविरोधी गटाला सचिवपद देऊ, असा प्रस्ताव बोल्ली यांनी मांडला, मात्र तो फलमारी विरोधकांना मान्य नव्हता. अशोक इंदापुरे, नागेश सरगम आदींची मनधरणी करण्याचा प्रयत्न बोल्ली यांनी केला, मात्र त्यास यश आले नाही.
अध्यक्ष निवडीबाबत एकमत होत नसल्याने अखेर बोल्ली यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सभात्याग केला.
या गोंधळाच्या वातावरणातच काही सभासदांनी निवडीचा वाद मिटेपर्यंत सत्यनारायण बोल्ली, हरिदास पोटाबत्ती प्रकाश जन्नू, श्रीनिवास क्यातम, श्रीनिवास संगा यांची पंच कमिटी नियुक्त करून मार्कंडेय रथोत्सव समिती नेमण्याबाबत सुचविले, मात्र त्यावर एकमत झाले नाही. शेवटी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी येत्या सहा महिन्यात नूतन विश्वस्त, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मतदान पद्धतीने घेण्यात यावी, असा प्रस्ताव सभेपुढे मांडला. सभेने त्याला मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले.
…. तोपर्यंत विद्यमान पदाधिकारीच काम पाहणार : फलमारी