धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला भेटल्याशिवाय राहणार नाही.
उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली. शिंदे गटानं यानंतर थेट शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. याचवेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेते पदाधिकार्यांना गळाला लावत उध्दव ठाकरेंना धक्केवर धक्के दिले जात आहे. शिवसेना नेमकी कुणाची ठाकरेंची की शिंदेंची ? याचा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
मात्र, याचदरम्यान आता मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर पक्षप्रमुख म्हणूनही एकनाथ शिंदे हेच हवेत असं विधान शिंदे गटातील नेत्यानं केलं आहे.
शिंदे गटाचे नेते व आमदार संतोष बांगर हे सेलू येथे एका कार्यक्रमाला आले होते.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बांगर म्हणाले, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची जी निवड आहे त्यात महाराष्ट्राचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर ते आम्हाला निश्चितपणे आवडणार आहे. धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे. बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकिकाला आणली.
त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला. पक्षप्रमुखांच्या निवडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निश्चित आवडेल. पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदेंना मिळालं तर आनंद होईल असंही आमदार संतोष बांगर यावेळी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाला माहितीय म्हणूनच…
शिवसेना नेमकी कुणाची यावर भाष्य करताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरेंगटावर टीकेची झोड उठवली आहे. म्हस्के म्हणाले, लोकशाहीमध्ये बहुमताला मान्यता आहे. त्यामुळे आमच्या शिंदे गटाकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निकाला ठाकरे गटाला माहिती असल्यामुळेच त्यांच्याकडून निकालाबाबत दुटप्पीपणाची भूमिका मांडली जात असल्याची टीका नरेश म्हस्के यांच्याकडून केली गेली आहे.
त्यामुळे पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षाची मान्यता ही लोकप्रतिनिधींच्या बहुमतावरच अवलंबून असते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाच्या धनुष्यबाणावर शिंदे गटाचा हक्क आहे असेही म्हस्के यांनी सांगितले.
उध्दव ठाकरेंची पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्ष कोणाचा असा वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात असतानाच ठाकरे गटासमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांचा पक्षप्रमुखपदी निवड झाली होती. आता २३ जानेवारीला त्याला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जर आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यावर काही आक्षेप असेल, तर त्यांनी निर्णय होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत वाढवावी,” अशीही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.