ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ढोर समाजाच्या देशव्यापी मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धर्माजी सोनकवडे, गुरूमाता, राजेश खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजासाठी काय योगदान दिले आहे याचे आत्मचिंतन करून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पुर्वीच्या लोकांनी काय केले त्यापेक्षा यापुढे काय करायचे आहे यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपला समाज लोकशाही मानणारा आहे. आम्ही मूठभर असलो तरी सुशिक्षित आहोत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष केला पाहिजे तरच यश प्राप्त होते कोणत्याही कामाला लाज वाटू देवू नका असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आरक्षण वर्गीकरणामुळे समाजावर काय परिणाम होणार आहे हे पुढील काळात समजेल परंतु आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण देवून सक्षम केले पाहिजे असेही शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येकाने समाजासाठी काम केले पाहिजे समाजातील मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे असे आपल्या मनोगतामधून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी व्यक्त केले.
समाजाच्या विकासासाठी मी कायम सोबत राहणार आहे अनेक अडचणी आहेत आरक्षणामध्ये इतर जाती घुसल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होत आहे संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
प्रारंभी या मेळाव्याचे संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रास्ताविक करीत समाजात अंतर्गत जनगणना केली तर आपण किती आहोत याची संख्या कळेल त्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे सर्वांनी सहकार्य करावे. समाजातील सक्षम असलेल्यांनी मागे राहिलेल्या समाजबांधवाना मदतीचा हाथ दिला पाहीजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना मदत केली तर समाज सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी सांगितले. दिपप्रज्वलन आणि संत कक्कय्या, शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यातून आलेल्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर देशभरात समाजाचे नावलौकीक वाढवणार्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले तर आभार सटवाजी होटकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सुधीर खरटकमल, मुन्ना कटके, सच्चिदानंद होटकर, अशोक सदाफुले, रविंद्र शिंदे, संगीता जोगधनकर, शारदा शिंदे, अॅड विद्या कटकधोंड, राजेश कटकधोंड,विनोद होटकर,नित्यानंद सोनकवडे, विनायक होटकर, गणेश शिंदे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या मेळाव्यासाठी ढोर समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती.