- पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षास व्यापारी व दलालांकडून कवडीमोल भाव मिळत आहे. बाजारात किलोवर मिळणाऱ्या रद्दीपेक्षाही द्राक्षांना कमी दर मिळत आहे. सध्या द्राक्षांच्या पॅकिंगसाठी बाजारात वापरात आणलेल्या रद्दीचा दर ४० रुपये किलो, तर द्राक्षांचा दर २० रुपये किलो आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले आहे.
जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यांत द्राक्षांचे चांगले उत्पादन घेतले जाते. सध्या जिल्ह्यात सर्वत्र बागा द्राक्षांनी लगडल्या आहेत. निर्यातीसाठी शेतकरी दलाल व व्यापाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. द्राक्ष हा नाशवंत असल्याने दलाल व व्यापारी जास्तीत जास्त माल कमीत कमी दरात खरेदी करताना दिसत आहेत. मात्र, हा माल खरेदी करताना त्याची किंमत बाजारात मिळणाऱ्या रद्दीपेक्षाही खालावल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
- सूर्यप्रकाशापासून द्राक्षांचा बचाव करण्यासाठी व त्यावरील हिरवा रंग टिकून राहण्यासाठी द्राक्षघडांना झाकण्यासाठी रद्दीचा वापर केला जातो. हा कागद मुंबईहून पिंपळगावच्या बाजारात दाखल होतो. त्यानंतर तो द्राक्ष निर्यात करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांकडे येतो.
- या हंगामात युरोप मार्केटला जाणाऱ्या द्राक्षांना ६० ते ७० रुपये किलोचा भाव मिळाला आहे, तर स्थानिक मार्केटसाठी तयार केलेल्या द्राक्षांना २० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. लांब मण्याच्या, तसेच गोलाकार मण्यांच्या द्राक्षांनाही २० ते २५ रुपये असा भाव आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचा कमीत कमी दरात द्राक्ष खरेदीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.