मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना हादरा दिला असून मुंबई होयकोर्टाच्या एका आदेशानंतर देशमुख यांनी स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून ही जबाबदारी सोपवण्यासाठी नव्या नेत्याची चाचपणी सुरू झाली आहे. यात शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत नेते आणि विद्यमान उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती हाती येत आहे. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून त्यांची जागा आता कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा असून शरद पवार वळसेंवर ही जबाबदारी सोपवणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वळसे यांच्या नावावर एकमत झाले असून त्यांच्याकडील उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर कामगार विभागाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.