जीवन समजून घ्यायचे असेल तर साहित्याकडे वळा – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन
लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर – साहित्य हे समाजाला विचार, संस्कार आणि संवेदनशीलता देणारे प्रभावी माध्यम असून, लोकमंगल साहित्य पुरस्कारांच्या माध्यमातून हीच जाणीव अधिक बळकट होते. प्रत्येकाला आपले जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांनी साहित्याकडे वळावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले.
सोलापूरातील अँपी थिएटर येथे शनिवारी आयोजित लोकमंगल साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूरचे आमदार व लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख होते.आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस यंत्रांवर अधिक अवलंबून झाला असून, निसर्ग, माणुसकी आणि भावनांपासून दूर जात आहे. अशा काळात प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक घटकाला समजून घेतल्यास जीवन अधिक समृद्ध होईल. प्रत्येकामध्ये चांगले पाहण्याची दृष्टी निर्माण झाली, तर जीवनात ‘मोगरा’ फुलेल, असेही शेलार यांनी नमूद केले.
यावेळी विविध साहित्यिकांच्या उल्लेखनीय साहित्यकृतींचा सन्मान करण्यात आला. प्रसाद कुमठेकर,वसई यांच्या ‘इतर गोष्टी’, प्रदीप सिद्धभट्टी,बुलढाणा यांच्या ‘विस्मरणाच्या अरण्यात’, चित्रा पालेकर,मुंबई यांच्या ‘तर अशी सारी गंमत’ तसेच मयूरेश कुलकर्णी,पुणे यांच्या ‘त्सुबाकी स्टेशनर्स’ या कादंबरीच्या अनुवादाला लोकमंगल पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच ज्ञानेश्वर जाधव बोरगाव, ता. बार्शी यांच्या ‘शून्यरेषा’ या विज्ञान कादंबरीलाही सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे यांना विशेष सन्मान देण्यात आला.
प्रत्येक पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख रक्कम, गौरवचिन्ह आणि सोलापुरी चादर देण्यात आली. समन्वयिका शोभा बोल्ली तसेच निवड समितीतील नितीन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे, शिरीष देखणे आणि डॉ. दत्ता घोलप यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमात आशिष शेलार व अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक आमदार सुभाष देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन शोभा बोल्ली यांनी मानले.
जिल्ह्याने आमदार देशमुखांकडून शिकावे
लोकमंगलच्या विविध योजना पाहिल्यावर आमदार देशमुख यांचे मंगल कार्य कळून येते. आमदार सुभाष देशमुख यांचे काम बोलते. कमी बोलणे आणि जास्त काम करणे हे सुभाष देशमुख करतात. त्यामुळे राज्यातील ते ताकदवर आमदार आहेत आम्हीही त्यांच्यापासून काहीतरी शिकतो आहे. जिल्ह्यानेही त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे नामदार शेलार म्हणाले.

