येस न्युज मराठी नेटवर्क । महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढली असून नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याचे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. यातच वाढत्या रुग्णांमुळे रक्ताची कमतरताही तीव्र जाणवत आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा पडला असून अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी तमाम जनतेला तसेच युवकांना पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात रक्तवाहिन्या कोरड्या पडल्या आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
‘महाराष्ट्रात पुढील 7 ते 8 दिवस रक्त पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे ही काळाची नितांत गरज आहे. तसेच युवकांनी स्वेच्छेने आणि नि:स्वार्थपणे होऊन रक्तदान करावे’ असे जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.