सोलापूर ः राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने उल्लेखनिय कामगिरीबद्दल कारंबा (ता.उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कौशल्या विनायक सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच अहमदनगर येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अहमदनगर येथील माऊली सभागृहात हा शानदार सोहळा झाला. आचार्य महंत महामंडलेश्वर जगदगुरु डॅा. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार सौ. सुतार यांना देण्यात आला. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वेळी कारंब्यातील माझं गाव, माझी माणसं फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, सरपंच सेवा संघाचे मार्गदर्शक बाळासाहेब पावसे, कानसा वारणा फाउंडेशनचे दिपक पाटील, ह.भ.प. राधाताई सानपमहाराज, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, विजयराव तनपुरे महाराज, डॅा. राधेश्याम गुंजाळ, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेल ओटी, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, श्रीमती विजयाताई काचावार, धुळ्याचे धनंजय विसपुते, शेंबाळपिंपरीचे सरपंच रविंद्र महल्ले, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, काशिनाथ पावसे उपस्थित होते. यावेळी बोलताना लहवितकर महाराज यांनी कारंबा गावाने अल्पावधीतच केलेल्या विकासकामाचा गौरव केला. तसेच गावचा विकास म्हणजे केवल लोकहित नव्हे तर राष्ट्रहित आहे, यापुढेही सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य द्या, असे सांगितले. श्री. पावसे यांनीही कारंब्याच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.