येस न्युज मराठी नेटवर्क । बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषीत केला. तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही भारतीय संघानं गचाळ क्षेत्ररक्षण करत झेल सोडले. त्यामुळे गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला. स्मिथ, ग्रीन आणि लाबुशेन यांना भारतीय खेळाडूंनी जीवनदान दिल्यामुळे ऑस्ट्रेलियानं भारतासमोर डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे.
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला रविंद्र जाडेजाची कमी जाणवत होती. पहिल्या डावात फलंदाजी करताना जाडेजाच्या बोटाला दुखपत झाल्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करतानाही भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना दीड दिवस ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघ कशी फलंदाजी करतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.