रत्नागिरी : विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना वाटते असे महत्वपूर्ण वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. ते चिपळून येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात तालिका सभापती म्हणून काम करताना भास्कर जाधव यांनी गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं.
तसंच भाजपच्या अभिरुप विधानसभेतील माईक काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन अध्यक्ष पद घेऊ नये असा सल्लाही भास्कर जाधव यानी दिला. शिवसेनेकडे वनखाते राहून जर अधिकचे विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर ते स्वीकारावे असे ते म्हणाले. राज्यातील भाजपचे नेते केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचा वापर करुन महाराष्ट्रातील मराठी नेते आणि उद्योगपतींना संपवण्याचे काम करत आहेत. तो त्रास मलाही होणार हे मला माहित आहे. पण मी ईडीला भीक घालत नाही. भाजपकडून जर त्रास झालाच तर मदत मागण्यासाठी मी कोणाच्या दारातही जाणार नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.