औरंगाबाद : संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. तब्बल 30 वर्षानंतर पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत.
राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यासाठी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या धामधुमीत आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या गावाची किर्ती संपूर्ण राज्यात घेऊन जाणारे भास्कर पेरे यांनी त्याचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. यामध्ये त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र, येथे भास्करराव पेरे यांच्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाला आहे. त्यांच्या मुलीसह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.