येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील शेतक-यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्यात म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज खांबांपासून 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या 26 जानेवारीपूर्वी अधिकृतपणे जोडण्या देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. राज्यात जवळपास 4 लाख 85 हजार अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या असून, यापैकी किमान 30 टक्के अनधिकृत जोडण्या या वीज खांबापासून 30 मीटरच्या आत आहेत. याशिवाय येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.
डॉ. नितीन राऊत यांनी आज मुंबईतील महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे महावितरणच्या सर्व उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेतली. राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या बैठकीस राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह सर्व संचालक, प्रादेशिक संचालक यांची उपस्थिती होती.
हे निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाची एक अनमोल भेट असल्याचे मानले जात आहे. डॉ. राऊत यांच्या या क्रांतिकारक आदेशामुळे कित्येक वर्षे महावितरणच्या कार्यालयात कृषिपंप वीज जोडणीसाठी खेटे घालणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी पंप वीज धोरणास अलिकडेच मंजुरी प्राप्त झाली आहे. यानुसार दरवर्षी एक लाख कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात येणार असून, या पंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा म्हणून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.