मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरमयान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही असं म्हटलं आहे. तर याचवेळी त्यांनी आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असल्याचं म्हटलं आहे.
“ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.