येस न्युज मराठी नेटवर्क । सध्या जगभरात करोनाच्या नव्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारानंतर अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी वाहतूक रोखली आहे. त्यातच आता ब्रिटनहून २४६ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे. भारतानेही सुरक्षेच्या कारणास्तवर ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद केली होती. २३ डिसेंबरला बंद करण्यात आलेली ही सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे.
भारतात सध्या करोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेले ८२ रुग्ण आहेत. त्यातच बुधवारी भारताने पुन्हा एकदा विमानसेवा सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठवड्याला ३० विमानांचं उड्डाण होणार आहे. यामध्ये भारतातून १५ आणि ब्रिटनमधून १५ उड्डाणं असतील. २३ जानेवारीपर्यंत अशाच पद्धतीने सेवा सुरु राहील अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. दिल्ली विमानतळावर ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या शहरात जाण्यासाठी पुन्हा विमानाने प्रवास करताना किमान १० तासांचा वेळ ठेवावा अशी सूचना केली आहे.