येस न्युज मराठी नेटवर्क । मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यावर आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली. परंतू कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी तिसऱ्या दिवसातलं अखेरचं सत्र खेळून काढत कांगारुंना २ धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली. दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ ६ गडी बाद १३३ धावांपर्यंत मजल मारु शकला.
दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्स उमेश यादवच्या गोलंदाजीवर ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेन मैदानावर स्थिरावतोय असं वाटत असतानाच आश्विनने त्याला कर्णधार रहाणेकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. लाबुशेनने २८ धावा केल्या. यानंतर वेड आणि स्मिथ यांनी उरलेली षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही.