सोलापूर (प्रतिनिधी) : रवीवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना……. लगीन घाई सुरू… 33 जोडपी कपाळाला बाशिंग आणि विशेष म्हणजे मास्क लावून मंचावर आली… या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फाऊंडेशन आयोजित करण्यात आलेला 31 वा सर्वजातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते.
माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर महिन्यातील 27 तारखेला कोरोनाच्या सावटतही शासनाचे सर्व अटी आणि नियम पाळत लोकमंगल फाऊंडेशन विवाह सोहळा साध्या पद्धतीने आणि उत्साहात पार पडले. या विवाह सोहळ्याचे हे 15 वे वर्ष होते. या विवाह सोहळ्यात 33 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या. कोरोनाची सर्व नियम पाळून हा विवाह सोहळा पार पडला. आलेल्या वर्हाडी मंडळींना मास्कचे वाटप करण्यात आले. बैठक व्यवस्थाही सोशल डिस्टन्सच्या पद्धतीने करण्यात आली होती. वधू- आणि वरांच्या मोजक्याच व्यक्तींना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. मसाले भात, पुरी भाजी, भजी आणि मोती चूर लाडू असा मेनू होता. जेवणाची व्यवस्था शहाजी पवार आणि त्यांच्या सहकार्यांची केली होती.
अशी होती मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ.संजय केळकर, स्मिता देशमुख, श्री रेणुक शिवार्चार्य महाराज (मंद्रुप), ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, लक्ष्मण महाराज, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार महाराष्ट्र शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, इस्कॉनचे प्रभुजी, गृहनिर्माण हैसिंग सोसायटीचे सीताराम राणे, विजय जाधव, नगरसेवक संगिता जाधव, राजकुमार हंचाटे, विजय जाधव, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, दिलीप पतंगे, इंद्रजित पवार, बसवराज शास्त्र यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान
यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिती देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले. यंदा कोरोनामुळे वधू-वरांची मिरवणूक काढण्यात आली नाही.
