येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरात कोरोना संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे कोरोनावर लस विकसित करण्यात काही औषध कंपन्यांना यश आले आहे. तर, काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यातही आली आहे. त्यामुळे लशीमुळे करोना जाणार असल्याची विश्वास व्यक्त होत असला तरी कोरोनापासून इतक्यात सुटका होणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. फायजरसह कोरोनावर लस विकसित करणारे बायोएनटेकचे सीईओ डॉ. उगुर साहिन यांनी हे वक्तव्य केले आहे.
एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांना जनजीवन सामान्य कधी होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना, आपल्याला सामान्य या शब्दाची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. कोरोनापासून इतक्यात आपली सुटका होणार नाही, ही वास्तविकता स्विकारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्गाचा जोर कमी जास्त होत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना आपल्यासोबत पुढील १० वर्षे तरी राहिल असे त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाचे थैमान जगभरात सुरू आहे. नाताळ सणाच्या काही दिवसआधीच नवा स्ट्रेन आढळल्याने ब्रिटनसह काही देशांमधील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १७.५० लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, सात कोटी ९० लाखांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग सर्वाधिक फैलावला असून एक कोटी ८७ लाखांहून अधिक करोनाबाधित आहेत. तर तीन लाख ३० हजार जणांना प्राण गमवावे लागले आहे.