येस न्युज मराठी नेटवर्क :कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूरला मी परत जाईन’, असे विधान केले होते. चंद्रकांतदादांच्या या ‘परत जाईन’ची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर आपली सविस्तर भूमिका मांडली व सध्या मी येथेच राहीन असे स्पष्ट केले.
मी कोल्हापूरला जाणार म्हणून कोणी हुरळून जाऊ नये वा दु:खीही होऊ नये. केंद्राने मला मिशन दिले आहे ते पूर्ण केल्यानंतरच मी कोल्हापूरला जाणार आहे. हा कालावधी दहा, वीस किंवा पंचवीस वर्षांचाही असू शकतो’, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या तरी मी येथेच राहणार आहे, असे नमूद करताना प्रत्येकाला मूळ गाव बोलवत असतं. त्यामुळे आपल्या मूळ गावी सेटल व्हावं असं मला वाटण्यात गैर काय?, असा सवालही पाटील यांनी केला. कोथरुडमधून पुढची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पुढची निवडणूक खूप दूर आहे, असे म्हणत पाटील यांनी हा प्रश्न टोलवला.
अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची खिल्ली उडवली होती. भाजपमधील एक नेता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, असे म्हणत असताना आता दुसरे नेते मी परत जाईन परत जाईन, असे म्हणायला लागले आहेत असे नमूद करत परत कोल्हापूरला जायचेच होते तर तुम्ही पुण्यात आलेच कशाला, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सावध उत्तर दिलं. यापूर्वी ते बोलत नव्हते आता ते बोलत आहेत. हा अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ आहे, असे पाटील म्हणाले. विरोधक असूनही जे चांगले आहे त्यास चांगलेच म्हटले पाहिजे, असेही पाटील यांनी पुढे नमूद केले.