आषाढी एकादशी यात्रेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने व्यापक नियोजन पूर्णत्वास नेले असून, यंदा १५ ते २९ जुलै या यात्रा कालावधीत १८ ते २० लाख भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज आहे. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दर्शनरांग, सुरक्षा, आरोग्य, निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आपत्कालीन सेवांसह सर्व सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. १६ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत श्री विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी शुद्ध एकादशी अर्थात २५ जुलै रोजी पहाटे २.२० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. त्याचबरोबर पाद्यपूजा, नित्यपूजा, संतांच्या भेटी, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वारकाला आणि प्रक्षाळपूजेसह सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.










