राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास ५ वर्ष पूर्ण – ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ अंतर्गत उपक्रम…
सोलापूर – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास 5 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण 357 विद्यार्थ्यांसाठी दिनांक 30 जुलै 2025 रोजी मनपा मुलांची उर्दू केंद्र शाळा कॅम्प सोलापूर या ठिकाणी दृष्टी मूल्यमापन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त,डॉ.सचिन ओम्बासे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, गिरीश पंडित,प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, विठ्ठल ढेपे, एच व्ही देसाई हॉस्पिटल चे असोसिएट डायरेक्टर डॉ. सुधीर सुदाल , व्ही.एम.स्मृती शासकीय मेडिकल कॉलेज , सोलापूर येथील डॉ. निलेश बागुल व त्यांचे सहकारी नेत्ररोग विभागातील वैद्यकीय तज्ञ, शाळेच्या मुख्याध्यापिका ,तबसुम शेख , पर्यवेक्षक भगवान मुंढे, श्रीमती नीलोफर सय्यद ,संतोष बुलबुले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.आयुक्त,डॉ.सचिन ओम्बासे यांनी समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमान्वये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी दृष्टी मूल्यमापन करून त्यांच्या गरजेनुरूप विविध प्रकारातील सेवा, पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्यामध्ये शस्त्रक्रिया ,चष्मे, या सेवा एच.व्ही.देसाई हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत स्वरूपात पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर लोविजन कीट, दिव्यांग प्रमाणपत्र, ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तके इत्यादी सेवा समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत पुरविल्या जाणार आहेत. ज्या मुलांना चष्म्याची शिफारस झाली आहे ,अशा मुलांनी चष्मे प्राप्त झाल्यानंतर त्याचा नियमितपणे वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. चष्मा वापरण्याची लाज बाळगण्याची गरज नाही असे देखील नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विद्या रोटे, विशेष शिक्षिका यांनी केले. तर उपस्थित विद्यार्थी पालक, शिक्षक व मान्यवरांचे आभार अविनाश शिंदे, समन्वयक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांनी परिश्रम घेतले.















