सोलापूर – पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले तसेच त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या धाडसी सैनिकी मोहिमेचे कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “भारत जिंदाबाद रॅली” चे आयोजन करण्यात आले.
ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. ना. रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली होती. सोलापूर शहर व जिल्हा स्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
रॅलीची सुरुवात पक्ष कार्यालय येथून झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. “भारत माता की जय”, “भारतीय सैन्याचा विजय असो”, अशा देशभक्तिपूर्ण घोषणा देत रॅलीने शहरात प्रभावी मार्गक्रमण केले.
यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते देशप्रेमाने ओथंबून या रॅलीत सहभागी झाले होते.
या प्रसंगी आपल्या भाषणात राजाभाऊ सरवदे म्हणाले, “22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करून त्याचा बदला घेतला. पाकिस्तानकडून असे हल्ले सातत्याने होत राहणार असतील, तर भारतीय सैन्याने युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा.”
या युद्धात महार बटालियनसह तिन्ही दलांच्या (थलसेना, नौसेना, वायुसेना) जवानांनी दाखवलेले शौर्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सोमनाथ भोसले,रवी गायकवाड,सुनील सर्वगोड,अतुल नागटिळक सर्व तालुका अध्यक्ष व शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते…