अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावर बोलताना राहुल गांधींनी लोकसभेपासून महाराष्ट्र विधानसभेपर्यंत वाढलेल्या मतदारांच्या संख्यावर आक्षेप घेतला. तसेच मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला.
राहुल गांधी म्हणाले की, ‘आरएसएसने संविधान स्वीकारले नाही. मोहन भागवत म्हणतात की 1947 ला नाही तर राम मंदिर स्थापन झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले’. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील यावरून राहुल गांधींना फटकारले.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, ‘तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. माझा तुम्हाला आग्रही आहे की तुम्ही जो विषय मांडाल तो तथ्यांच्या आधारे मांडा. मी तुम्हाला आधी देखील सांगितले आहे की जे संसदेचे सदस्य नाहीत त्यांची चर्चा करू नका. तुम्ही नियमांचे पालन करा.’
संविधानाला कोणी हात लावू शकत नाही…
राहुल गांधी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तुम्ही 400 पारच्या घोषणा देत होत्या.संविधान बदलण्याचे बोलत होता. पण निकालानंतर आम्ही पाहिले की पंतप्रधान आले अन् त्यांनी संविधान मस्तकाला लावून ते नतमस्तक झाले. काँग्रेसला याचा आनंद आहे की संविधानला कोणतीही ताकद बदलू शकत नाही. संविधानाप्रमाणेच देश चालणार.
70 लाख मतदार कसे वाढले?
राहुल गांधी, म्हणाले मतदानाच्या अधिकारामुळे संविधान सुरक्षित राहते. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तब्बल 70 लाख मतदार वाढले. पाच वर्षात जेवढ्या मतदारांची नोंदणी झाली नाही ती केवळ पाच महिन्यात झाली.यामध्ये काही तरी गडबड आहे.